Tuesday, July 4, 2023

मैत्रीचे पान


      

 मैत्रीचे ते पान जे जीवन रुपी पुस्तकात जपून ठेवले जाते..जितके जुने झाले तितकेच अजून जाळीदार बनते. जितके जुने होते तितके अधिक सुंदर भासू लागते. या पानावर अनेक आठवणींचे जाळे पसरलेले असते. जाळीच्या प्रत्येक नक्षीत एका वेगळ्या भावनेची गुंफण असते. कोणत्या जाळीत डोकावल्याने ओठावर हसू उमलते तर कोणती जाळी डोळ्यात पाणी आणते. एका टोकावर गमतीची नक्षी असते तर दुसऱ्या कोपऱ्यात विरहाचे दुःख सलते. कधी कधी टोकावर विरणारे हे पान हृदयाला चरे घालून जाते तर कधी कधी हेच पान सुंदर ढगात बसवून आकाशाची सफर घडवून आणते. प्रत्येकाच्या पानाची जाळी आणि प्रत्येकाच्या मैत्रीचे बंध हे जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येकाच्या हृदयात ह्या मैत्रिरूपी पानाची जागा भक्कम असते. काही पानांना फार दिवसांपासून स्पर्श न केल्यामुळे ते नाजूक बनते तर काही पानं वारंवार हात लावल्याने विरू लागतात. मैत्रीचे बंध जरी नाजूक भासत असले तरी ते आयुष्यभर टिकणारे असे असते. कितीही जुने झाले तरी त्यातील ऋणानुबंधांचा गंध काही कमी होत नसतो. त्या जुन्या आठवणींचा तो कोमल मखमली स्पर्श मनाला सुखावून जातो. कधी एकटे वाटल्यास हळूच पुस्तक उघडून ते मैत्रीचे पान बाहेर काढावेसे वाटतेत्यावरील मखमली आठवणींच्या जाळीला निरखून पहावेसे वाटते. एकट्या मनाला आधार देणारे ते पानदुःखी हृदयाला दुःख विसरावयास लावणारे ते पानअबोल मनाला शब्दांचा स्पर्श करणारे ते पानअखेर वाळवंट झालेल्या अंतकरणाला मृगजळ बनते ते पान. शेवटी व्यक्ती दूर झाल्या तरी आठवणी मात्र कायम राहतात. सहवास जरी कमी झाला तरी आभास मात्र कायम राहतो. आणि पुस्तक जरी बंद झाले तरी ते पान त्या पुस्तकात लपून जाते आणि त्या पुस्तकाचाच  एक भाग बनते. मैत्री ही अशीच असते जीवनात येते आणि जीवनाचाच एक अविभाज्य भाग बनून जाते. तुमच्याही आयुष्यात असेलच ना असे एखादे पान..!!!!

 

                            

 


No comments:

Post a Comment