Wednesday, November 2, 2022

यश प्राप्ती

यश प्राप्तीसाठी कठीण मार्ग निवडावा लागतो. पण एकदा का आपण तो मार्ग निवडला तर काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही. जरी मार्ग कितीही खडतर असला आणि मार्गात संकटे आली, अनेक अडचणी आल्या, तुम्हाला विरोध झाला, तुमचा अपमान झाला, कोणी तुम्हाला नावे ठेवली, तुमचे पाय मागे ओढण्याचा प्रयत्न केला, तुमच्या विचारांची थट्टा उडवली, तुमच्या प्रयत्नांची मस्करी केली, मार्गात अडवले, काहीही झाले तरी मार्गात थांबू नका. चांगल्या कामासाठी निर्लज्ज व्हा. आपला मान, सन्मान, अहंकार व  मोठेपणा सर्व काही सोडा. आपल्याला फक्त धेय्य गाठायचे आहे इतके लक्षात ठेवा. ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यास घाबरु नका. ठरवूनच ठेवा की शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचेच.
कारण यशाचे सर्वोच्च शिखर गाठणे सर्वांच्यानेच होते असे नाही त्यासाठी कठोर परिश्रम करणारी व्यक्ती लागते. जर कोणी एक व्यक्ती त्या यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू शकते तर आपण का नाही? ह्या विचाराने शहाण्या माणसाने वेडे होऊन चालत राहावे. कारण हे वेडपणच आपल्याला आपल्या मार्गात टिकवून ठेवू शकते. आपण किती हळू चाललो हे महत्त्वाचे नाही तर आपण चालत चालत कोठपर्यंत पोहोचलो यालाच महत्त्व असते. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या प्रत्येकालाच लहान पणापासून माहीत आहे. धावण्यात चपळ असूनही ससा मागे राहिला कारण त्याच्याजवळ सातत्य नव्हते त्याउलट कासवाने हळूहळू का होईना शर्यत पूर्ण केली व आपले ध्येय गाठले. चातुर्य आणि शहाणपण एकीकडे आणि मेहनत आणि चिकाटी एकीकडे. ध्येय गाठण्यासाठी सर्व सद्गुणांची सांगड घालून सुद्धा जर आपल्या अंगी टिकून राहण्याची चिकाटी नसेल तर कदाचित अंगी असलेले दुसरे सर्व गुण व्यर्थ होऊ शकतात म्हणूनच धीर आणि चिकाटी न सोडता विजय मिळेपर्यंत प्रयत्न करीत रहा.

No comments:

Post a Comment